सेलू : जिल्हा परभणी
सेलू शहरातील अत्यंत वर्दळीचा व महत्त्वाचा रेल्वे स्टेशन ते नर्मदा पेट्रोल पंपापर्यंतचा मुख्य रस्ता पूर्णपणे उखडून गेला असून खड्ड्यांमुळे अपघात होत आहेत. सुमारे ९–१० वर्षांपूर्वी मा. आ. विजय भांबळे यांच्या कार्यकाळात रेल्वे स्टेशन ते रायगडपर्यंत चकाचक डांबरी रस्ता करण्यात आला होता. मात्र गेल्या दोन वर्षांपासून सार्वजनिक बांधकाम विभागाच्या दुर्लक्षामुळे रस्त्याची अवस्था अत्यंत दयनीय झाली आहे.
पाथरी रस्त्याचे काम सुरू असताना रेल्वे स्टेशनपर्यंतचा रस्ता अर्धवट ठेवण्यात आला. यासंदर्भात बांधकाम विभाग व मुख्यमंत्री यांच्याकडे अर्ज व निवेदने देण्यात आली, तसेच सर्व वृत्तपत्रांत बातम्या प्रकाशित झाल्या; तरीही कोणत्याही राजकीय पक्षाने किंवा प्रशासनाने ठोस दखल घेतलेली नाही.
आज या रस्त्यावरून प्रवास करणाऱ्या नागरिकांना धूळ, खड्डे व उखडलेल्या रस्त्यामुळे प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. खड्डे चुकवताना अपघात होत असून त्याकडे प्रशासन जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचा आरोप नागरिकांकडून होत आहे.
रेल्वे स्टेशन ते रायगडपर्यंत काही ठिकाणी तातडीने गतिरोधक बसवावेत, अशी मागणी अनेक दिवसांपासून सातत्याने होत आहे. मात्र सार्वजनिक बांधकाम विभाग याकडे डोळेझाक करत आहे. या मुख्य रस्त्यावर नूतन महाविद्यालय, क्लासेस, सिनेमागृह व मंगल कार्यालय असल्याने विद्यार्थी, तरुणाई तसेच नागरिकांची मोठ्या प्रमाणावर वर्दळ असते. भरधाव वेगाने धावणाऱ्या वाहनांमुळे या रस्त्यावर आतापर्यंत अनेक अपघात झाले असून काहींना जीव गमवावा लागला, तर अनेक जखमी झाले आहेत.
१५ डिसेंबर रोजी याच रस्त्यावर झालेल्या भीषण अपघातात सर्वोदय नगर येथील एका नागरिकाचा मृत्यू झाला असून एक जण गंभीर जखमी झाला आहे. यापूर्वीही भरधाव वाहनांमुळे अनेक अपघात घडले आहेत. प्रत्येक अपघातानंतर पोलिसांत तक्रारी दाखल होतात; मात्र माणूस मृत्युमुखी पडल्यानंतरच प्रशासन जागे होणार का, असा संतप्त सवाल उपस्थित होत आहे.
शहरातील नागरिक, पालक व विविध संघटनांकडून बसस्टँड समोरील रस्ता तातडीने नवीन करावा तसेच रायगड कॉर्नर ते रेल्वे स्टेशन, जिंतूर नाका ते रेल्वे गेट, छत्रपती शिवाजी महाराज पुतळा ते बिहाणी ऑइल मिल या ठिकाणी त्वरित गतिरोधक बसवावेत, अशी मागणी करण्यात येत आहे. मात्र अनेक पक्ष व संघटनांनी निवेदने दिली असतानाही सार्वजनिक बांधकाम विभाग व लोकप्रतिनिधींच्या दुर्लक्षामुळे अपघातांत नागरिकांचे जीव जात असल्याचा आरोप होत आहे.
पालकमंत्र्यांच्या मतदारसंघात आणखी किती अपघात आणि किती नागरिकांचे बळी गेल्यानंतर दखल घेतली जाणार, असा प्रश्न उपस्थित होत असून आता तरी सार्वजनिक बांधकाम विभाग व पालकमंत्र्यांनी तातडीने लक्ष घालून रस्ता दुरुस्त करावा व गतिरोधक बसवून पुढील अपघात टाळावेत, अशी तीव्र मागणी सेलू शहरातील नागरिकांकडून करण्यात येत आहे.

✍🏻मुख्य संपादक – अशोक अंभोरे
























