सेलू | प्रतिनिधी (जि. परभणी)
सेलू शहरातील गायत्री नगर खून प्रकरणाला नवे वळण मिळाले असून, या प्रकरणात पोलीस प्रशासनावर गंभीर आरोप करण्यात आले आहेत. मुख्य आरोपी अद्याप फरार असताना, पोलिसांनी राजकीय दबावाखाली निरपराध व्यक्तींना खोट्या गुन्ह्यात अडकविल्याचा आरोप अॅड. सुनिता ढोले यांनी केला आहे.
शनिवार, २५ एप्रिल रोजी आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी सांगितले की, गायत्री नगर येथील आदित्य प्रधान खून प्रकरणातील मुख्य आरोपी अशोक पाईकराव हा अद्याप मोकाट असून, त्याला पकडण्यात पोलीस अपयशी ठरत आहेत. उलटपक्षी, आरोपीला आश्रय देण्याचे काम पोलीस करत असल्याचा गंभीर आरोप त्यांनी यावेळी केला.
याच प्रकरणात त्यांच्या पती विष्णू ढोले यांच्यावर कलम १०९(१) व शस्त्र बाळगल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, तो पूर्णतः खोटा व बनावट असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. “माझे पती फक्त पोलिसांना खून प्रकरणाच्या तपासाबाबत वारंवार विचारणा करत होते, याच कारणामुळे त्यांना लक्ष्य करून राजकीय दबावातून गुन्ह्यात अडकवण्यात आले,” असे अॅड. ढोले यांनी नमूद केले.
घटनेच्या ठिकाणाबाबतही पोलिसांच्या कथनात विसंगती असल्याचे त्यांनी निदर्शनास आणून दिले. “कधी उपजिल्हा रुग्णालयाच्या आत, तर कधी बाहेरील मेन गेटवर घटना घडल्याचे सांगितले जाते. त्यामुळे सत्य बाहेर येण्यासाठी सीसीटीव्ही फुटेज सार्वजनिक करावे,” अशी मागणी त्यांनी केली.
या प्रकरणात लवकरच विशेष पोलीस महानिरीक्षक, नांदेड परिक्षेत्र यांच्याकडे अधिकृत तक्रार दाखल करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
🔹आंदोलनाचा इशारा🔹
मुख्य आरोपी अशोक पाईकराव याला तात्काळ अटक करावी व विष्णू ढोले यांच्यावर दाखल केलेला कथित खोटा गुन्हा मागे घ्यावा, अन्यथा सामाजिक संघटनांच्या मदतीने लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा अॅड. सुनिता ढोले यांनी दिला.
🔹 पीडित कुटुंबाकडे दुर्लक्ष?🔹
गायत्री नगर येथे किरकोळ वादातून आदित्य प्रधान यांचा खून झाला असून आनंद ढोले यांच्यावर जीवघेणा हल्ला झाला आहे. ते सध्या उपचाराधीन आहेत. मात्र, या घटनेनंतरही सामाजिक संघटना व राजकीय नेत्यांनी पीडित कुटुंबीयांची साधी भेटही घेतलेली नाही, ही अत्यंत दुर्दैवी बाब असल्याची खंत त्यांनी व्यक्त केली.
🔹 प्रकरण गंभीर; निष्पक्ष तपासाची मागणी जोर धरत आहे 🔹
या सर्व आरोपांमुळे प्रकरण अधिकच चिघळण्याची शक्यता असून, नागरिकांमध्ये निष्पक्ष तपास करावा मागणी जोर धरू लागली आहे.

✍🏻मुख्य संपादक – अशोक अंभोरे




गायत्री नगर येथे किरकोळ वादातून आदित्य प्रधान यांचा खून झाला असून आनंद ढोले यांच्यावर जीवघेणा हल्ला झाला आहे. ते सध्या उपचाराधीन आहेत. मात्र, या घटनेनंतरही सामाजिक संघटना व राजकीय नेत्यांनी पीडित कुटुंबीयांची साधी भेटही घेतलेली नाही, ही अत्यंत दुर्दैवी बाब असल्याची खंत त्यांनी व्यक्त केली.



















