सेलू/ प्रतिनिधी
राज्य महामार्ग ५४८ (बी) च्या भूसंपादन प्रक्रियेत प्रशासनाकडून मोठ्या प्रमाणावर अनियमितता होत असल्याचा गंभीर आरोप मोरेगाव (ता. सेलू) येथील शेतकरी प्रदीप भास्करराव मगर यांनी केला आहे. सुरुवातीला १५ मीटर जमीन संपादित करण्याचे सांगून आता प्रत्यक्षात १७ मीटरपर्यंत मोजणी करण्यात येत असल्याने शेतकऱ्यांमध्ये संताप व्यक्त होत आहे. यासंदर्भात मगर यांनी उपविभागीय अधिकारी, सेलू यांच्याकडे लेखी तक्रार दाखल करून फेरमोजणीची मागणी केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, राज्य महामार्ग ५४८ (बी) साठी यापूर्वी शासनाकडून करण्यात आलेल्या मोजणीत १५ मीटरपर्यंत जमीन संपादित होणार असल्याचे संबंधितांना सांगण्यात आले होते. मात्र, त्यानंतर कोणतीही पूर्वसूचना न देता अचानक १७ मीटरपर्यंत मोजणी करण्यात येत असल्याचा आरोप करण्यात आला आहे.
दि. ६ मे २०२६ रोजी संबंधित विभागाचे मोजणी अधिकारी घटनास्थळी आले असता त्यांनी १७ मीटरपर्यंतची जमीन शासनाच्या मालकीची असल्याचे सांगितले. तसेच जादा घेतल्या जाणाऱ्या जमिनीचा कोणताही मोबदला मिळणार नसल्याचेही स्पष्ट केल्याने शेतकरी हादरले आहेत.विशेष म्हणजे, या महामार्गाचे काम काही ठिकाणी ९० फूट तर काही ठिकाणी १०० फूट रुंदीने सुरू असताना, मगर यांच्या शेताजवळ मात्र तब्बल १०८ फूट रुंदी दाखवली जात असल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. त्यामुळे शेतकऱ्यावर अन्याय होत असल्याची भावना व्यक्त केली जात आहे.
या वाढीव मोजणीमुळे रस्त्यालगत करण्यात आलेल्या बांधकामाची भिंत पाडण्यात येणार असल्याचेही संबंधित अधिकाऱ्यांनी सांगितल्याचा दावा मगर यांनी केला आहे. कोणतीही पूर्वसूचना अथवा नोटीस न देता कारवाईचा इशारा दिल्याने शेतकरी कुटुंब चिंतेत सापडले आहे.यासंदर्भातील निवेदनाच्या प्रती तहसीलदार तसेच भूमी अभिलेख कार्यालयालाही देण्यात आल्या असून प्रशासनाने तात्काळ फेरमोजणी करून न्याय द्यावा, अशी मागणी होत आहे

✍🏻मुख्य संपादक – अशोक अंभोरे
























