
सेलू (जि. परभणी) : महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय श्री. अजितदादा पवार यांचे २८ जानेवारी रोजी विमान दुर्घटनेत अपघाती निधन झाल्याने संपूर्ण महाराष्ट्र शोकसागरात बुडाला आहे. सेलूसह तालुक्यातील शोककळा पसरली होती. दुर्दैवी घटनेने नागरिकांमध्ये मोठी हळहळ व्यक्त केली जात आहे.
या पार्श्वभूमीवर गुरुवार, २९ जानेवारी रोजी सायंकाळी सेलू येथील साई नाट्यगृहात सर्वपक्षीय श्रद्धांजली सभेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात राजकीय, शैक्षणिक, सामाजिक व सांस्कृतिक क्षेत्रातील मान्यवर नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून दिवंगत अजितदादा पवार यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली.
या श्रद्धांजली कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी साईबाबा बँकेचे चेअरमन व माजी नगराध्यक्ष हेमंतराव आडळकर होते. यावेळी सेलूचे नगराध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने प्रेक्षाताई भांबळे, रामनाना खराबे, रामेश्वर पोळ, प्राचार्य डॉ. शरद कुलकर्णी, प्राचार्य डॉ. व्ही. के. कोठेकर, ज्येष्ठ पत्रकार मोहम्मद इलियास यांच्यासह अनेक मान्यवरांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.
वक्त्यांनी अजितदादा पवार यांच्या कणखर नेतृत्वशैली, स्पष्टवक्तेपणा, प्रशासनावरची पकड आणि सर्वसामान्य जनतेसाठीची तळमळ यांना उजाळा दिला. “दादांच्या अकाली जाण्याने महाराष्ट्राने एक प्रभावी नेतृत्व गमावले असून ही पोकळी कधीही भरून न निघणारी आहे,” अशा भावना यावेळी व्यक्त करण्यात आल्या.
दरम्यान, दुपारी सेलू येथील क्रांती चौकातही विविध क्षेत्रातील नागरिकांनी एकत्र येत दिवंगत उपमुख्यमंत्र्यांना भावपूर्ण आदरांजली वाहिली. या संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुभाष मोहकरे यांनी केले.
दादांच्या जाण्याने केवळ एक नेता नव्हे, तर लाखो कार्यकर्त्यांचा आधार हरपल्याची भावना सेलूकरांच्या मनात स्पष्टपणे जाणवत होती.

✍🏻मुख्य संपादक – अशोक अंभोरे
























