सेलू (जि. परभणी, प्रतिनिधी) – शासकीय कामकाजात अडथळा निर्माण करून पोलिसांच्या वाहनावर तलवारीने हल्ला करण्याचा प्रयत्न झाल्याची गंभीर घटना दि. 22 एप्रिल रोजी दुपारी 12.45 वाजण्याच्या सुमारास येथील शासकीय रुग्णालयाच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ घडली. या प्रकरणी सेलू पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून घटनेमुळे शहरात मोठी खळबळ उडाली आहे. मात्र, या घटनेला आता राजकीय रंग चढला असून आरोपीच्या कुटुंबीयांनी पोलिसांवर गंभीर आरोप केले आहेत.
पोलीस निरीक्षक दीपक बोरसे यांनी दिलेल्या फिर्यादीत नमूद केल्याप्रमाणे, एका गुन्ह्यातील अटक आरोपींना वैद्यकीय तपासणीसाठी शासकीय वाहनातून रुग्णालयात नेले जात असताना काही इसमांनी मोटारसायकल व स्कुटी आडवी लावून वाहनाचा मार्ग अडवला. संबंधित अटक आरोपींमध्ये बुद्धभूषण ढगे, रवींद्र पाईकराव आणि अजय उघडे (सर्व रा. गायत्री नगर, सेलू) यांचा समावेश होता. यानंतर आरोपींनी गोंधळ घालत शासकीय कामात अडथळा निर्माण केला.
फिर्यादीनुसार, मुख्य आरोपी विष्णू ढोले याने हातात तलवार घेऊन वाहनातील आरोपींवर जीवघेणा हल्ला करण्याचा प्रयत्न केला. मात्र, उपस्थित पोलीस कर्मचाऱ्यांनी तत्परतेने हस्तक्षेप करत त्याचा हात पकडला, त्यामुळे मोठा अनर्थ टळला. या घटनेदरम्यान आरोपी व पोलीस यांच्यात झटापटही झाली.
या प्रकरणी विष्णू ढोले, राजीक नुर कुरेशी, आश्वीन साळवे व अन्य तीन अनोळखी इसमांविरोधात भारतीय न्याय संहिता 2023 मधील विविध कलमांसह शस्त्र कायदा व महाराष्ट्र पोलीस अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सपोनि घायवट करीत आहेत.
दरम्यान, या प्रकरणाला नाट्यमय वळण मिळाले असून आरोपी विष्णू ढोले यांच्या पत्नी अॅड. सुनिता ढोले यांनी पोलिसांच्या कारवाईवर थेट सवाल उपस्थित केले आहेत.
अॅड. सुनिता ढोले यांनी सविस्तर प्रतिक्रिया देताना म्हटले की, “माझे पती विष्णू ढोले यांच्यावर राजकीय दबावाखाली येऊन खोटा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र काही राजकीय पुढाऱ्यांच्या दबावामुळे पोलिसांनी मुख्य आरोपींना वाचवून माझ्या पतीला टार्गेट केले.”
त्या पुढे म्हणाल्या, “आदित्य प्रधान खून प्रकरणातील मुख्य आरोपी अजूनही मोकाट आहे. पोलिसांना त्याची सर्व माहिती असूनही त्याला अटक केली जात नाही. माझे पती याबाबत वारंवार मोबाईलवरून विचारणा करत होते. त्यामुळेच त्यांच्यावर सूडभावनेतून गुन्हा दाखल करण्यात आला.”
पोलिसांनी लावलेल्या गंभीर कलमांवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत त्या म्हणाल्या, “कुठल्याही व्यक्तीस प्रत्यक्ष इजा झाली नाही. तरीही जीवघेण्या हल्ल्याचे कलम लावण्यात आले आहेत. जर माझे पती हद्दपार असतील, तर त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करून पुन्हा हद्दपार करण्यात यायला हवे होते. मात्र तसे न राजकीय पुढाऱ्याच्या सांगण्यावरून माझ्या पत्नीवर खोटे गुन्हे दाखल करून आमच्या कुटुंबावर अन्याय केला जात आहे.”
“हा प्रकार म्हणजे ‘चोर सोडून संन्याशाला फाशी’ देण्यासारखा आहे. आम्ही या प्रकरणात न्यायालयीन लढा देणार असून सत्य बाहेर आणणार,” असा इशाराही त्यांनी दिला.
एकीकडे पोलिसांची गंभीर स्वरूपाची फिर्याद आणि दुसरीकडे आरोपीच्या कुटुंबीयांचे राजकीय दबावाचे आरोप यामुळे हे प्रकरण अधिकच गाजत आहे. सत्य नेमके काय, हे तपासानंतर स्पष्ट होणार असले तरी सध्या या घटनेमुळे,पोलिसांनी केलेल्या कारवाईमुळे शहरात उलट सुलट चर्चा होत आहे.

✍🏻मुख्य संपादक – अशोक अंभोरे
सेलू (जि. परभणी, प्रतिनिधी) – शासकीय कामकाजात अडथळा निर्माण करून पोलिसांच्या वाहनावर तलवारीने हल्ला करण्याचा प्रयत्न झाल्याची गंभीर घटना दि. 22 एप्रिल रोजी दुपारी 12.45 वाजण्याच्या सुमारास येथील शासकीय रुग्णालयाच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ घडली. या प्रकरणी सेलू पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून घटनेमुळे शहरात मोठी खळबळ उडाली आहे. मात्र, या घटनेला आता राजकीय रंग चढला असून आरोपीच्या कुटुंबीयांनी पोलिसांवर गंभीर आरोप केले आहेत.



एकीकडे पोलिसांची गंभीर स्वरूपाची फिर्याद आणि दुसरीकडे आरोपीच्या कुटुंबीयांचे राजकीय दबावाचे आरोप यामुळे हे प्रकरण अधिकच गाजत आहे. सत्य नेमके काय, हे तपासानंतर स्पष्ट होणार असले तरी सध्या या घटनेमुळे,पोलिसांनी केलेल्या कारवाईमुळे शहरात उलट सुलट चर्चा होत आहे.



















