सेलू | प्रतिनिधी
शासनाच्या महत्त्वाकांक्षी मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना अंतर्गत सेलू तालुक्यात सुरू असलेल्या कामांमध्ये मोठ्या गैरप्रकाराचा संशय व्यक्त होत आहे. कंत्राटदारांकडून तांत्रिक निकषांना फाटा देत निकृष्ट दर्जाचे काम केले जात असून, शेतकऱ्यांकडून अवैध वसुली केल्याचे गंभीर आरोप समोर आले आहेत. या प्रकरणी साळेगाव येथील ग्रामपंचायत सदस्य राहुल भिसे यांनी पुराव्यासह उपकार्यकारी अभियंत्यांकडे लेखी तक्रार दिल्याने प्रशासनात खळबळ उडाली आहे.
पायाभरणीच निकृष्ट; वादळात संच टिकणार कसे?
सौर पंप प्रकल्पासाठी मजबूत पायाभरणी अत्यंत आवश्यक असते. तांत्रिक नियमानुसार सौर पॅनेल संचासाठी किमान ५ ते ६ फूट खोल काँक्रीट फाउंडेशन असणे आवश्यक आहे. मात्र, सेलू तालुक्यात अनेक ठिकाणी केवळ २ ते ३ फूट खोल खड्डे खोदून काम उरकले जात असल्याचे समोर आले आहे.
स्थानिक शेतकऱ्यांच्या म्हणण्यानुसार, संबंधित अधिकारी प्रत्यक्ष पाहणी न करता कार्यालयातूनच अहवाल मंजूर करत असल्याचा आरोप आहे. त्यामुळे भविष्यात वादळ-वाऱ्यात हे लाखो रुपयांचे संच कोसळल्यास त्याची जबाबदारी कोण घेणार, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
‘चिरमिरी’च्या नावाखाली शेतकऱ्यांची लूट.या योजनेअंतर्गत कंत्राटदारांकडून शेतकऱ्यांकडे मजुरी, खड्डा खोदणे आणि साहित्य वाहतुकीच्या नावाखाली अवैध पैसे मागितले जात असल्याची तक्रार आहे. काही ठिकाणी तर सिमेंट, रेती यांसारखे साहित्य देखील शेतकऱ्यांनीच उपलब्ध करून द्यावे, असा दबाव टाकला जात असल्याचे समोर आले आहे.
पैसे देण्यास नकार दिल्यास काम अर्धवट सोडून देणे किंवा मजुरांकडून उद्धट वागणूक देणे असे प्रकार घडत असल्याची माहिती स्थानिकांनी दिली आहे.
कंत्राटदार पुढील पद्धतीने घोटाळा करत असतो यामध्ये निकृष्ट पायाभरणी, आवश्यक ५–६ फुटांऐवजी केवळ २–३ फूट खड्डेअवैध वसुली, विविध कारणांनी शेतकऱ्यांकडून पैशांची मागणी,साहित्याची सक्ती, शासकीय साहित्याऐवजी शेतकऱ्यांकडून सिमेंट-रेती मागणे
अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष, प्रत्यक्ष पाहणी न करता कामांना मंजुरी विशेष म्हणजे सेलू-जिंतूर मतदारसंघाच्या आमदार तथा राज्याच्या ऊर्जामंत्री यांच्या मतदारसंघातच हा प्रकार घडत असल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. स्थानिक नागरिकांनी या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी केली आहे.
या तक्रारीच्या प्रती परभणी जिल्हाधिकारी तसेच महाराष्ट्र राज्याच्या विज महावितरण च्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना देखील पाठवण्यात आल्या आहेत. आता प्रशासन दोषींवर कारवाई करते की प्रकरण दडपले जाते, याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.
“महावितरणच्या दुर्लक्षामुळे कंत्राटदार शेतकऱ्यांची लूट करत आहेत. संपूर्ण तालुक्यातील कामांचे तातडीने थर्ड पार्टी ऑडिट व्हावे. दोषी कंत्राटदारांना ब्लॅकलिस्ट करून त्यांचे पेमेंट थांबवावे. सात दिवसांत कारवाई न झाल्यास लोकशाही मार्गाने महावितरण कार्यालयावर आंदोलन करण्यात येईल असा इशारा साळेगाव येथील शेतकरी राहुल भिसे यांनी दिला आहे.

✍🏻मुख्य संपादक – अशोक अंभोरे
























